शरद पवार , बोलणे आणि राजकीय व्यवहार श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ज्या व्यक्तीची सर्वाधिक चर्चा होत आहे ती व्यक्ती म्हणजे शरद पवार ! काही लोकांनी तर शरद पवारांनी संपूर्ण लक्ष महाराष्ट्राचे आपल्याकडे यानिमित्ताने कसे वळवले आणि हे कसे त्यांचे प्लॅनिंग होते तेही सांगायला सुरुवात केली आहे.जणू काय शरद पवारांनीच हा सगळा डाव रचला आणि अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्व लक्ष आपल्याकडे खेचले . वास्तविक असे काहीही घडलेले नाही हे सर्व घडण्याचे सर्वात मोठे कारण उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीचे अपघाती झालेले निधन हेच आहे.जेव्हा अशा प्रकारचे निधन होते तेव्हा साहजिकच अनेक कथा दंतकथा फुटतात आणि कॉन्स्पिरसी थेरीज रचल्या जातात . ही एक उत्तर आधुनिक माणसाची अलीकडच्या काळात डेव्हलप झालेली चिन्ह स्थिती आहे . अशावेळी शांत डोक्याने काय होत आहे ते पाहणे हे फार अवघड होऊन जाते.
सर्वसाधारणपणे माध्यमात राजकीय नेते किंवा प्रवक्ते सात पद्धतीने बोलतात
१ स्पष्ट आणि ठाम बोलणे या पद्धतीत सत्य माहीत नसले तरी ठाम विधाने केली जातात आणि ती स्पष्ट पणाने बोलली जातात . आणि जे माहित आहे त्याबद्दल तर नक्कीच ठामपणे बोलले जाते.
२ स्पष्ट पण संदिग्ध बोलणे या पद्धतीत ठामपणे बोलले जात नाही पण जे माहित आहे ते स्पष्टपणे सांगितले जाते आणि जे संदिग्ध आहे ते संदिग्ध पद्धतीनेच सांगितले जाते.
३ खोटे बोलणे या पद्धतीत सरळ सरळ खऱ्याचे खोटे करून सांगितले जाते. मात्र हे सांगताना त्या बोलण्याचा खऱ्याशी काही संबंध असतो
४ कपोकल्पित बोलणे या पद्धतीत खऱ्याशी असलेला खोट्याचा संबंधही तुटतो आणि मनुष्य स्वतःच्याच कल्पनेने अनेक गोष्टी मीडियामध्ये सांगत असतो. सध्याच्या काळात हा अधिक डेव्हलप झालेला असा रोग आहे जो अनेक प्रसिद्धीमुखी लोकांना भरपूर प्रसिद्धी देतो
५ खरे बोलणे यामध्ये खरे सर्व माहिती झालेले असते आणि त्यामुळे ते ठाम पणाने सांगितले जाते पण त्या सांगण्याला मुळातच पुराव्यांचा आधार असतो आणि इथे खरे काय आहे ते आधी शोधले गेलेले असते त्यामुळे मनुष्य खरे बोलतो
६ गूढ बोलणे इथे इशारे वजा गूढ भाषेत बोलले जाते आणि अर्थ समोरच्या व्यक्तीवर सोपवला जातो
७ मिश्र बोलणे वरील सहा पद्धतीपैकी अनेक पद्धती एकमेकात मिक्स करत अनेकदा राजकीय नेते प्रवक्ते बोलत असतात . त्यांना काही गोष्टी खऱ्या सांगायच्या असतात आणि काही गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक खोट्या बोलायच्या असतात अनेकदा तर काय खरे आहे काय खोटे आहे हेही कळत नाही कधी कधी काल्पनिक फटाक्याची माळ पण लावली जाते. मीडियाला अशा व्यक्ती आवडतात कारण त्यांचे खरे खोटे वेगळे करणे फार कठीण होऊन बसते आणि डिबेटला चान्स मिळतो .
शरद पवार हे संदिग्ध पण स्पष्ट बोलणे या कॅटेगरीमध्ये येतात या पद्धतीमध्ये येतात अपवादात्मक वेळेला त्यांनी गूढ पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो साहजिकच अशा व्यक्ती माध्यमांना आवडत नाहीत आणि पत्रकारांना तर आवडतच नाहीत अपवाद ज्यांना खरे आवडते असे पत्रकार ते मात्र यात सुद्धा बरोबर बातमी शोधतात शरद पवारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होतो की ते जी गोष्ट संदिग्ध आहे ती गोष्ट कधीही माहीत असल्याचा आव आणत नाहीत. ते सहसा संतापत नाहीत अनेकदा माहिती जास्त दिली जाते . स्वतःच्या भविष्याविषयी तर ते कधीच बोलत नाही . अपवादात्मक वेळेला इशारा देतात . त्यामुळेच अजित पवारांच्या मृत्यूबद्दल कॉन्स्पिरसी थेरिज येऊ शकतात हे लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब माध्यमात येऊन निवेदन दिले याचे कारण हेच होते की खूप काही गोष्टी मग घडू नयेत आत्ताच आवर घातला जावा आणि प्रत्यक्षातही ते बऱ्यापैकी घडले बहुदा असे घडेल याचा त्यांना अंदाज आलेला असावा सर्वसाधारणपणे शरद पवार यांची प्रतिमा अलीकडे प्रचंड भ्रष्टाचारी नेता अशी करण्याची स्पर्धा सुरू आहे साहजिकच त्यांच्या विरोधात नेहमीच विरोधकांच्याकडे गाडाभर पुरावे असतात पण हा पुराव्यांचा गाडा नेमका कधी मिळणार आहे हे काही कोणी सांगत नाही फक्त चर्चा होत राहतात प्रतिमा खराब होत राहते किंबहुना अनेकदा तर असा संशय येतोय की हे अत्यंत जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठीच केले जात आहे . अनेक पत्रकार मला नेहमी बोलतात की पुरावे आहेत असं करप्शन आहे पण प्रत्यक्षात काही असं प्रकरण त्याने आणलेले आहे किंवा मीडियामध्ये प्रकाशित केलेले आहे असे काही दिसत नाही .
शरद पवार हे मीडियामध्ये खोटे बोलले असे सुद्धा किती वेळा सिद्ध झाले आहे ? शरद पवार संदिग्ध बोलतात डाऊटफुल बोलतात याचे कारण त्यांना अनेकदा वस्तुस्थिती माहीत नसली की ते ठामपणे बोलत नाहीत पण जेव्हा गोष्ट ठामपणे माहित असते तेव्हा ती स्पष्टपणे सांगतात पण त्यांची सांगण्याची पद्धत अशावेळी कॅज्युअल असते . विलीनीकरणाच्या गोष्टी ते म्हणतात म्हणजे झाल्या असण्याची बरीच शक्यता आहे खुद्द अजित पवार यांच्या अलीकडच्या भाषणांच्या मध्ये सुद्धा तशी काही विधाने आढळतात. आता त्यांचे हे खरे बोलणे दुसऱ्या गटाला झेपणारे नाही म्हणून साहजिकच मग प्रत्येकाने त्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो . मुळात फडणवीस यांची गोची अशी होती की त्यांना एक अतिशय दमदार असा मंत्री आणि दोस्त हवा होता त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेसा असा दोस्त त्यांना अजित पवार यांच्या रूपाने मिळाला याबद्दल काही शंका नाही . अनेकदा राजकीय लोकांच्या गरजा आपणाला कळत नाहीत पण अशी गरज होती एक प्रकारे पैशाची सर्व व्यवस्था अजित पवार सांभाळतील याची खात्री असल्याने पुढच्या अनेक गोष्टी करणे फडणवीस यांना शक्य झाले होते आता मात्र याही गोष्टीत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणजे एका अर्थाने फडणवीस यांना डबल इंजिन सारखे काम करावे लागणार . यातला गोंधळ असा आहे की अजित पवार फडणवीस यांच्याशी विलीनीकरणाबाबत बोललेले नाहीत पण मुळातच एकदा दोघांच्या मध्ये जो प्रियास्को झाला होता ते लक्षात घेता जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत बोलायचे नाही असा कदाचित अजित पवार यांची भूमिका असावी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात विलीनीकरण नव्हते हा काही युक्तिवाद होऊ शकत नाही .
पण याचमुळे सत्ताधारी लोकांच्याकडून एक वातावरण असे तयार करण्याचा प्रयत्न झालाय की शरद पवार याबाबत खोटे बोलत आहेत . अर्थातच फडणवीस नेहमीच पवारांच्याच पठडीत बोलत असल्याने त्यांनी पवारांच्याच पद्धतीने विधाने केली आहेत जेणेकरून भविष्यात कोणी असे म्हणू नये की फडणवीस खोटे बोलले . अफवा दोन्ही बाजूने उठलेल्या होत्या मुख्य म्हणजे अजित पवार या सगळ्या हिंदुत्ववादी माहोल मध्ये स्वतःला फिट आहोत असे मानायला तयार नव्हते किंबहुना आपला पक्ष मोडीत काढला जाणार आहे असेही त्यांना वाटत होते मुख्य म्हणजे ज्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न घेऊन ते पुढे सरकले होते ते स्वप्न आता भाजपबरोबर कधीही साकार होणे शक्य नाही भाजपकडून कायमच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येतील याची त्यांना जाणीव झालेली होती . चान्स फक्त एकच होता तो म्हणजे जर का खुद्द देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले तर ! पण ही एक रिमोट शक्यता होती . त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फुटल्याने त्यांना प्रत्यक्षात काय मिळाले हाच प्रश्न होता . पण मतभेदाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की भाजप बरोबर जायचे की नाही आणि याबाबतीत शरद पवार ठाम नसल्याने सगळा गोंधळ उडालेला आहे जर का एक नि:संदिग्ध भूमिका पवार यांनी घेतली असती तर हा सगळा गोंधळ झालाच नसता . वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार यांच्यासाठी भाजप "असून अडचण नसून खोळंबा" असा झालेला आहे . भविष्यात भाजपा शिवाय कोणी सत्तेवर येईल का? हा खरा प्रश्न पवार यांच्या मनामध्ये चाललेला असावा आणि याचे उत्तर नाही असे आल्याने मग करायचे काय असा प्रश्न पडतो . कारण भाजपच जर का सत्तेवर राहणार असेल तर मग कायम विरोधी पक्षात बसावे लागणार आणि पवार यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना सत्तेत किंवा सत्तेजवळ राहणे आवडते . खरे तर हा प्रॉब्लेम सगळ्या काँग्रेस बाबत आहे हे मी मागच्या लेखात सांगितलेलेच आहे . आणि अजित पवार हेच समजावून सांगत होते की भाजप शिवाय पर्याय नाही युतीत जावेच लागेल . एका अर्थाने अजित पवार एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगत होते आणि पवार यांची गोची अशी होती की त्यांच्या आयडिया लॉजिकल वातावरणामध्ये त्यांनी केलेल्या सर्व ॲडजस्टमेंट या सेक्युलर ऍडजेस्टमेंट होत्या आणि प्रथमच एक असा पक्ष समोर होता जो सेक्युलर अजिबातच नव्हता म्हणजे त्यांच्या दृष्टीने नव्हता . त्यामुळे ते काही वर्षे वाट बघत होते आणि आता त्यांना असं वाटायला लागले होते की भाजप संविधान मोडणार नाही आणि संविधानाच्या चौकटीतच काम करेल . मात्र जी खात्री वाटायला पाहिजे होते ती वाटत नव्हती आणि म्हणूनच दोलायमान स्थिती झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी होती की महाराष्ट्रात आपण स्वतःच्या जीवावर सत्तेवर येऊ हे जे त्यांचे स्वप्न होते ते कधीच साकार झाले नाही. आणि हळूहळू आता स्थिति अशी झाली की बहुधा ते होणारच नाही अशावेळी करायचे काय? तर विरोधी पक्षात बसून मिळालेल्या मोजक्या जागा गोंजारत बाक वाजवत बसणे . यातही प्रॉब्लेम असा की नवीन पिढीतली जे राजकारणी आलेले आहेत त्यांना आयडालॉजीशी काही सोयरे सुतक नाही त्यामुळे जर का सत्ता आली नाही तर आपल्या पक्षातील उरले सुरले नेते केवळ बाक वाजवत बसतील यावर विश्वास ठेवणे कठीण होते त्यामुळे ते निवडून आणले तरी सुद्धा भाजपाला जाऊन मिळतील याची त्यांना खात्री पटली होती विशेषता जर का आपला पुतण्या जाऊन मिळत असेल तर मग बाकीच्यांची गॅरंटी काय घ्यावी ? म्हणजे पक्ष शाबूत ठेवण्यासाठी सुद्धा भाजपची गरज निर्माण झालेली दिसते किंवा मग पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवून नव्याने संपूर्ण पक्ष उभा करणे पण प्रॉब्लेम पुन्हा तोच आहे पुन्हा पक्ष उभा केला तरी पुन्हा फूट पडणार नाही याची गॅरंटी काय ? जेथे सत्ता जिकडे सत्ता तिकडे नीतिमत्ता अशी उत्तर आधुनिक विचार करणारी एक राजकारणी लोकांची पिढीच आता निर्माण झालेली आहे आणि या पिढीनेच खरे तर शरद पवार यांची खरी गोची केलेली आहे याचे कारण त्यांचा इतिहास आहे . एका अर्थाने सगळेच शरद पवार झालेले आहेत आणि प्रश्न असा आहे की म्हाताऱ्या लोकांना हे नवीन शरद पवार झालेले लोक आदर देणार का तर त्याचेही उत्तर नाही असे आहे . म्हातारपणाविषयी कसलाही आदर या नवीन उत्तर आधुनिक पिढीला नाही . आणि हे काय केवळ फक्त राजकारणात नाही तर जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये आलेले आहे. हा या पिढीचा उत्तराधुनिक नैतिक स्वभाव आहे त्याचे तुम्ही काय करणार ? त्यामुळे जरी आपण तत्त्वाशी बांधिलकी मानली तरी आपल्याजवळ जर का निवडून येणारे लोक थांबणार नसतील तर मेहनत तरी कशाला करायची ? म्हणजे आपण अजित पवार निर्माण करायचे आणि या सर्व अजित पवारांनी भाजपाला जाऊन मिळायचे याने साधणार काय ?
यावर उपाय एकच आहे तो म्हणजे शरद पवारांनी शांतपणाने आपल्या काँग्रेसचे विसर्जन मुख्य काँग्रेसच्या प्रवाहात करावे पण प्रॉब्लेम तिथेही असाच आहे की राहुल गांधी त्यांचा आदर रिस्पेक्ट ठेवतील का आणि या प्रश्नाचे सुद्धा उत्तर दुर्दैवाने हो असे येत नाही आणि खरी गोची इथेच आहे . त्यामुळेच अजित पवार यांनी आता तुम्ही रिटायर व्हा असे सांगितलेले होते ते एका अर्थाने बरोबर होते पण प्रॉब्लेम असा आहे की आपण रिटायर झालो तर आपला पक्ष नीट चालेल याची जी खात्री लागते ती खात्री इथे नाही म्हणजेच रिटायरमेंट नंतर ऑफिस नीट चालायला पाहिजे अशी खात्री रिटायर होणाऱ्या माणसाला लागते ती खात्री शरद पवार यांच्या जवळ नाही आणि हीही गोची आहे . किंबहुना आजच्या सगळ्या जगण्याचा केऑस आणि येथॉस शरद पवार ही व्यक्ती अनुभवत आहे . दाही दिशा उदास आणि भकास होण्याचा अनुभव ज्यांना आहे त्यांनाच फक्त शरद पवार यांचे काय झाले आहे ते कळू शकते. खरंतर मराठी लोकांनी त्यांना पराभूत केले पंतप्रधानकीसाठी ठाम पणाने त्यांच्या मागे उभे राहणे हे कधीही मराठी लोकांनी केलेले नाही . जितक्या काड्या टाकता येतील तितक्या टाकल्या . हा एक पहिला असा मराठी मनुष्य होता ज्याला दिल्लीच्या तक्तावर बसायचे होते . त्यासाठी ते लायकही होते पण दुर्दैवाने ते ज्या संस्कृतीत जन्मलेले आहेत ती संस्कृती प्रॉब्लेम म्हणून अडथळ्यासारखी येत आहे ती ना स्वतः दिल्लीत बसते ना आपल्या माणसाला बसू देते . आता तर अशी एक स्थिती आलेली आहे की शरद पवार यांची दिल्लीत बसण्याची लायकीच नव्हती अशा प्रकारचा निष्कर्ष काढणारे ही महाभाग निर्माण झालेत त्यामध्ये मराठी लोकांचा टिपिकल इन्फिरीयर कॉम्प्लेक्स आहे आणि नॉन मराठी लोकांना मुळात असा मराठी लोकांना कॉम्प्लेक्स देणे आवडते . अशावेळी एक उपाय असतो तो म्हणजे मराठी लोकांच्यातून बाहेर पडून पूर्णपणे नॉन मराठी लोकांची गॅंग तयार करणे आणि त्यांच्या साह्याने सर्व व्यवस्था मॅनेज करणे . प्रमोद महाजन यांनी हे केले होते पण अनफॉर्च्युनिटली त्यांचे निधन झाले अन्यथा तेच एक असे होते जे शरद पवार यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी लायक होते. त्यांची ही हत्या एका मराठी माणसाने आणि सख्ख्या भावाने भाऊबंदकीमध्ये केली हे मराठी संस्कृतीला साजेसेच आहे . विज्ञानाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर यांची सर्वाधिक चेष्टा ही नेहमीच मराठी लोकांनी केलेली आहे . कुठलाही जागतिक दर्जाचा माणूस निर्माण झाला की त्याच्या पायात पाय घ**** ही आपली संस्कृती आहे मराठी माणसे मत्सरग्रस्त आहेत हीच वस्तुस्थिती आहे कुठल्याही जागतिक दर्जाचा माणूस आला रे आला की त्याच्याबद्दल अत्यंत हीन किंवा मध्यम दर्जाचे लोक आपोआप काड्या टाकायला लागतात त्यामुळेच निसर्ग दत्त महाराज यांच्याबद्दल मराठी माणूस बोलत नाही तो ओशोंच्याबद्दल बोलतो . या मत्सरग्रस्ततेचे काय करावे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी नेहमीच सांगतो की तुमचा दर्जा जर जागतिक असेल तर तुम्ही ताबडतोब मराठी संस्कृतीतून बाहेर पडा आणि जगात प्रसिद्ध व्हा हे मराठी लोक तुमच्या मागोमाग आपोआप येतील (अर्थातच याला अपवाद कदाचित मोक्ष हवा असेल तर आहे कारण तिथे मळ्यात काही संस्कृतीकडून अपेक्षाच नसतात किंबहुना तुम्ही जर संस्कृतीकडून अपेक्षा ठेवत असाल तर तुम्हाला मोक्ष मिळणे शक्यच नसतं अन्यथा मोक्षाच्या क्षेत्रात सुद्धा काही मराठी लोकांनी फार सपोर्ट दिलाय असे दिसत नाही ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांची आता मराठी लोक नावे घेत असले तरी त्यांना ते हयात असताना मराठी लोकांनी फक्त तापच दिलेला आहे )
त्यामुळे आता भविष्यात शरद पवार यांना चुकून चान्स जरी आला तरी मला खात्री आहे मराठी लोक काड्या टाकतील . त्यामुळे करायचे काय हा एक फार मोठा प्रश्नच आहे . अनेक लोक रिटायर व्हा म्हणून सांगताहेत पण शरद पवार रिटायर झाले तर असे काय नेमके पॉझिटिव्ह इफेक्ट येणार आहेत ?
माझे स्वतःचे मत असेच आहे की जोपर्यंत शरद पवारांना खेळावेसे वाटते तोपर्यंत आता त्यांनी खेळावे मात्र सूत्रे आता सुप्रियाच्या हातात द्यावीत . तिला राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनवावा . सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये तिला व्यवस्थित सेटल करावे केंद्रामध्ये पाठवण्याची जी काही व्यवस्था अजित पवार यांच्यामुळे होती ती आता लागू होत नाही . स्वतःच स्वतंत्र अस्तित्व खासदार निवडून आणण्यापुरते असेल तरच केंद्रात तुमचा निभाव लागतो पवार यांची ती ताकद होती ती ताकद आता सुप्रिया सुळे यांच्यामध्ये राज्याचे राजकारण टाळून स्वतंत्रपणे निर्माण होईल अशी शक्यता खूप कमी आहे. थोडक्यात म्हणजे सुप्रिया सुळे यांना आता दुसरे शरद पवार बनणे भाग आहे . त्यांच्यात ते गुण पण आहेत. मात्र त्यांनी धार्मिक बाबतीत आता अधिक सर्वसमावेशक होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अधिकाधिक इंग्लिश बोलणे आवश्यक आहे . पण सर्वात मुख्य गोष्ट आता कळत न कळत महाराष्ट्र काबीज करणे अशीच झाली पाहिजे. दुसरी गोष्ट इंदिरा सोनिया काँग्रेसमध्ये शरद पवार यांना फार स्थान नसले तरी मला वाटते की सुप्रिया सुळे यांच्यासाठी तिथे जास्त मोकळ्या वाटा आहेत . त्यांनी एकदा झाले गेले विसरून जाऊया असे सांगत सोनिया गांधी यांची भेट घेणे आवश्यक आहे आणि राहुल गांधी यांना त्यांच्याशी दीर्घ चर्चा करून काय हवे आहे आणि आपल्याकडून काय त्यांना दिले जाऊ शकते आणि त्यांच्याकडून काय मिळू शकते याचा अंदाज घेत एक पॉलिटिकल डिझाईन करता येते का हे पाहायला हवे . माझे स्पष्ट मत असे होते की शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्य काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये आधीच जाऊ द्यायला पाहिजे होते . पण बहुदा राहुल गांधी यांच्या बद्दल त्यांना खात्री वाटत नसावी खरे तर ती अनेकांना वाटत नाही आणि तोच खरा प्रॉब्लेम आहे. पण यामध्येच संधी आहे हे त्यांच्या बहुदा लक्षात आलेले नाही.
एकंदर काय शरद पवार समजून घेणे कठीण वगैरे नाही . ते नेहमी संदिग्ध गोष्टींना नेहमी संदिग्ध ठेवतात इतकी साधी गोष्ट आहे आणि हाडाचे राजकारणी असल्यामुळे लपवाछपवीत ते अत्यंत उस्ताद आहेत . त्यांची नीतिमत्ता जितकी दाखवली जाते तितकी पोकळ नाही . मात्र ते संत पण नाहीत . त्यांना राजकीय चाली खेळण्यात एक प्रकारचा बौद्धिक आनंद मिळतो आणि अनेकदा असे बौद्धिक आनंद हे डेंजरस बनत जातात .
खरे तर उतारवयामध्ये सर्व जबाबदारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टाकून त्यांनी निवृत्त व्हायला हवे होते पण परिस्थिती अशी झाली की अचानक भाजप आला आणि काँग्रेसचे सगळेच नेते पराभूत व्हायला लागले अशा वेळी काँग्रेस शाबूत ठेवण्यासाठी म्हणून रिटायरमेंट घेणे अवघड बनले. अजित पवार यांना स्वतःचे म्हणावे असे किती नेते तयार करता आले असा प्रश्न आता विचारायला पाहिजे. शरद पवार यांनीच तयार केलेले नेते ही काही त्यांची राजकीय अचिव्हमेंट होऊ शकत नाही . शरद पवारांनी ज्याला हात सुद्धा लावला नाही आणि निखळ अजित पवार यांच्यामुळे जे डेव्हलप झाले असे नेमके किती राजकारणी आहेत हे एकदा नीट तपासले पाहिजे . आणि अशा लोकांची खरोखर राजकीय उंची काय आहे हेही एकदा नीट तपासले पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक राजकीय नेते आपल्या तालमीत तयार करणे ही गोष्ट फक्त अलीकडच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनाच जमलेली आहे . दुर्दैवाने त्यांनी तयार केलेल्या लोकांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले . या खंजिरांचा अंदाज का आला नाही हा खरा प्रश्न आहे. अनेक लोक नातेवाईकगिरीवर टीका करतात पण बाहेरून आलेल्या लोकांना तयार केल्यानंतर ते बाहेरचे लोक जर का वफादारी विसरत असतील आणि खंजीर खुपसणार असतील तर बाहेरच्या लोकांना का तयार करावे . स्वतःच्या आस्तिनमध्ये साप कोणीही ठेवू इच्छित नाही . भारतामध्ये नातेवाईकगिरी असण्याचे सर्वात मोठे कारण बाहेरच्या लोकांचा वफादारी करण्यावर नसलेला विश्वास हे आहे . त्यामुळेच आपल्याकडे वफादारीचे तत्व वारंवार शिकवले जाते पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ते कधीही अमलात आणले गेलेले दिसत नाही . खुद्द शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याबाबत जे काही केले त्यामुळेच त्यांची विश्वासार्हता संशयाच्या धुक्यात उभी राहीली . या कर्माची फळे त्यांना मिळणारच होती ती अजित पवार यांच्या रूपाने मिळाली. एका अर्थाने बरे झाले या जन्मात हिशेब फिटला.
सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या मागे जाणार नाहीत असेच सध्या बोलले जात आहे परंतु शरद पवार मागे नसतील तर वेगवेगळ्या कायदेशीर संस्था कुठल्या कुठल्या पातळीवर कशा कशा ऍक्टिव्हेट होतील हे सांगता येणे फार कठीण आहे. त्याचा विचार बहुदा सुनेत्रा पवार यांनी केला नसावा पण हे घडणे अटळ आहे. जर का त्यांचा सर्व रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ असेल तर त्या तगतील अन्यथा त्यांच्यामागे अनेक गोष्टींचा ससेमीरा हळूहळू लावून त्यांना संपवले जाईल किंवा मग आपल्या तालावर त्यांच्यामार्फत विशिष्ट पद्धतीने राजकारण खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. माझा अंदाज चुकला नाही तर विधानसभा निवडणूक जिंकणे त्यांना सोपे जाणार नाही . त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाडणे हा भाजपाला फायदा असेल कारण मग आपोआपच हे जे लोक थांबलेले आहेत ते भाजपमध्ये सरळ येतील आणि या दिशेने भाजप नक्की विचार करत असणार . अजित पवार आता नाहीत त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जितकी सोपी दिसते तितकी ती सोपी नाही . जर का भाजपने खरोखर मनापासून त्यांना मदत केली तरच त्या जिंकणे शक्य आहेत अन्यथा नाही . शिवाय ज्यांच्या जीवावर त्या आता उप मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्या लोकांनाही काय वाटते हे फार महत्त्वाचे आहे हे लोक खरोखर विश्वासार्ह आहेत का हा एक फार मोठा प्रश्न आहे . अन्यथा असे होऊ शकते की ज्यांच्यामुळे त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत तेच त्यांना नंतर मात्र बाजूला करायचा प्रयत्न करतील. कारण हे लोक कोणाचेच आता राहिलेले नाहीत ते आता शरद पवार यांचे नाहीत अजित पवार यांचे ते खरोखर होते की नाही हे संदिग्ध आहे आणि आता सुनेत्रा पवार यांच्या मागे उभे राहण्याची खरोखर आवश्यकता आहे का असा प्रश्न ते निश्चितपणे स्वतःला विचारत असतील आणि किती काळ मागे राहायचे याची काल निश्चिती करत असतील.
राजकारणात नेहमीच काळ वैऱ्याचा असतो आणि वेळ आपली असते ती येण्याची वाट पाहावी लागते ज्याला ती वेळ कळते तो ती साधतो आणि पुढे जातो ज्याला ती साधता येत नाही तो मागे पडत जातो इतके हे सगळे थेट आहे राहता राहिलो आपण सामान्य माणसे ! काय घडेल हे निमुटपणे पाहणे एवढेच आपल्या डोळ्यांच्या हाती आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment